Wednesday, December 25, 2019

अनुभव तांडवाचा भाग दोन


        श्री चंदन-वंदनच्या भेटी नंतर आम्ही निघालो जलमंदिराचे धन आपल्या कातळात जपणाऱ्या किल्ले श्री नांदगिरी उर्फ कल्याणगडच्या दिशेने.पायथ्याहूनच आकाशात झेपावलेल्या नांदगिरीला वर पर्यंत कच्चा  गाडीरस्ता आहे. त्यावरून जसजसे वर जाऊ लागलो तसतसे माझ्या मित्राला हायसे वाटू लागले. दरवाजा पाहताच त्याचा चेहरा आनंदाने भरून गेला. वाटेत एका वळणावर आम्हाला पवनचक्की अगदी जवळून पाहता आली. तिथून मग महादरवाजाच्या दारातच गाडी थांबविली. थोड्या चढाईनेच महादरवाजा पार करताच एक वाट डावीकडे गुहामंदिराकडे उतरते. तिथे जाऊन साहित्य बाहेर ठेवून आत गेलो. अतिशय थंड पाणी , पूर्णतः अंधाराने भरलेली गुहा,खाली वाकून केलेली वाटचाल असे शंभर फूट आत गुहेमध्ये जावे लागते,सारेच थरारक आपण कधी ना कधी हा थरार अनुभवायलाच पाहिजे. मित्र बाहेर बसल्यामुळे मी मोबाईलच्या प्रकाशात आत जाऊ लागलो. शंभर पावले चालून जाताच आतमध्ये भगवान पार्श्वनाथांची,एका देवतेची आणि श्री दत्तात्रयांची सुरेख मूर्ती आहे.त्यांचे दर्शन घेऊन गुहामंदिरातून बाहेर आलो. तिथून आणखी वर येताच गडाचा दुसरा पुर्वाभिमुख दरवाजा लागतो, एक मारूतीरायाचे मंदिर तिथेच असून त्याला नमस्कार करून गडमाथ्यावर प्रवेश करता झालो. गडावर एक पाण्याचे बांधीव टाके आणि एक इतिहास कालीन इमारत इतके अवशेष आहेत. इतर अवशेष झुडूपांनी आपल्या ताब्यात घेतले असून अनोखे गुहामंदिर जपणाऱ्या कल्याणगडला आपण दुर्गभक्तांनीही जपले पाहिजे. संपूर्ण गडदर्शन करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो.पहिला गड पहायला मिळाल्याचे समाधान माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर दिसत होते.त्याच समाधानात आम्ही किल्ले श्री वर्धनगड कडे निघालो .
            पाऊण तासातच आम्ही श्री वर्धनगडच्या पायथ्याशी असणाऱ्या त्याच्याच नावाने वसलेल्या गावामध्ये पोहोचलो. सूर्य मावळतीकडे झुकला होता. पण आमची इच्छा अजूनही भरात होती.आम्ही  गड चढायला सुरूवात केली. गड चढताना उजव्या बाजूला गडाची सावली हळूहळू अख्खे गाव आपल्या कब्जात घेत होती. मनात आले ,या गावाला दररोज  जगाच्या सूर्यास्ताआधी एक तास आधीच सूर्यास्त अनुभवास येत असेल. अशाच विचारात अगदी सोप्या चढाईने श्री वर्धनगडाच्या गोमुखी आकाराच्या महादरवाजात पोहोचलो. अतिशय भक्कम अशा बांधणीच्या दरवाजाचे रूप डोळ्यांत साठवून पुढे वाटचाल सुरू ठेवली. वाटेत मारूतीची मूर्ती ,महादेवाचे मंदिर आणि खोदीव पाण्याचे टाके लागते.ते पाहून सर्वोच्च ठिकाणच्या वर्धनीमातेच्या मंदिराचे दर्शन घेतले. तिथून खाली उतरून गडाच्या दक्षिण तटबंदीत असणारा छोटा चोरदरवाजा पाहिला.अतिशय सुस्थितीतील वर्धनगडच्या तटबंदीवर काही ठिकाणी झाडे आणि झुडपे उगवली आहेत ती वेळीच काढली पाहिजेत . तटबंदीचे बांधकाम काय मजबूतीने केले आहे ते त्या तटबंदीवरून चालतानाच जाणवते. सूर्यदेव ढगांशी झुंज देत देत क्षितिजाच्या आड जात होते आणि आम्ही त्या संधी प्रकाशात गडउतार होऊ लागलो.
          आता ध्येय होते किल्ले श्री महिमानगडाचे. सायंकाळ झाली होती.हळूहळू काळोख आपले साम्राज्य वाढवत होता आणि आम्ही महिमानगडच्या दिशेने सुसाट सुटलो होतो. रहिमतपूरच्या सुनिल निकम यांनी दिवसभर आम्हाला कॉल करून योग्य त्या सूचना काळजीपूर्वक दिल्या होत्या . त्यांच्या प्रेममय सूचना आम्हाला दिशा दाखवत होत्या . महिमानगड गावी पोहोचायला सायंकाळचे साडे सहा वाजून गेले होते आणि पूर्ण अंधार पसरला होता. पायथ्याशी असणाऱ्या एका घरी विचारपूस करून वर गडावर जायचे नक्की केले. माझ्या मित्राने तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला .पूर्ण अंधार ,दिसत काही नव्हते ,गड चढाई अगदी थोडीच असली तरी अनोळखी होती. काका विचारले "आता अंधारात काय पाहणार तिथे जाऊन ? " मी म्हटलं " गडाच्या दरवाजाला नमस्कार करून येईन , गड देवतेला पाया पडून येईन पण जाऊन येईनच .."  असे म्हणून मी एकट्यानेच गड चढायला सुरूवात केली.
           त्या झुडूपातून जाणाऱ्या वाटेवरून जाताना मनात आले "गड फक्त पहायलाच यायचे असते का ?  ...नाही नाही ...कधी कधी गड अनुभवायचाही असतो. भर रात्रीत गड सर करणाऱ्या शिवरायांच्या हेराला काय अनुभव येत असेल ? भर रात्री कोंढाण्याच्या डोणागिरी कड्याखाली जमलेल्या तीनशे भुतांना काय अनुभव येत असेल ?  भर पावसात भर रात्री पन्हाळ्याहून स्वराज्याच्या धन्याला नेणाऱ्या सहाशे मावळ्यांच्या काळजात काय तरंग उमटत असतील.? हे सगळे सगळे आठवत मी एकटाच त्या रात्री किल्ले श्री महिमानगडच्या दरवाजात पोहोचलो . मोबाईल टॉर्चच्या प्रकाशातच त्याच्या भक्कम  तटबंदीचे दर्शन घेतले.कधीकाळच्या बलदंड बाहूच्या मावळ्यांनी ज्याचे संरक्षण केले त्या दरवाजाला नमस्कार केला. आणखी थोडे वर जाऊन मारूतीरायाला वंदन केले. दूरवर असंख्य दिवे लुकलुकताना महिमानगडावरून पाहणे खूपच रोमांचकारी होते. ते पाहिले आणि गडउतार झालो.
          तिथून मग रहिमतपूर गावी असणारे आणि सह्याद्रीच्या कृपेने नवीनच मित्र बनलेल्या डॉ.श्री सुनिल निकम यांना भेटण्यास गेलो.त्यांचा जिव्हाळा इतका अपार की त्यांनी दिवसभर मला प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी फोनवरून काळजीपूर्वक सूचना दिल्या आणि काहीही करून भेटीस येण्याचा प्रेममय आदेश दिला.त्यांना भेटलो गडकोटांच्या भ्रमंतीच्या चर्चेमध्येच आमची पंगत बसली आणि सह्याद्रीच्या शिरावरील मुकूटासमान एक एक दुर्गवारीचे त्यांचे बोल मनात साठत राहिले.सह्याद्रीच्या आणि महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला एक जीवलग मिळाले होते.आणि त्यांच्या श्रीवंदनच्या संवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचा शब्द देऊन त्यांचा निरोप घेतला आणि आम्ही आमच्या गावी सुखरूप पोहोचलो.

(टीप - दिनांक १७-१२-२०१९ रोजी आमची किल्ले श्री चंदन-वंदन ,श्री नांदगिरी ,श्री वर्धनगड ,श्री महिमानगड ही सातारा जिल्ह्यातील पाच दुर्गांची दुर्गवारी संपन्न झाली.)

समाप्त


































Tuesday, December 24, 2019

अनुभव तांडवाचा भाग एक


        'सह्याद्रीचे वारे' वाचून आणि पाहून माझा एक मित्र माझ्यावर रागावला. म्हणाला मलाही पाहायचे आहेत गड किल्ले आणि तुला माहिती असूनही मला न सांगताच एकटा गेलास. मी म्हटलं आता पुण्याहून कोल्हापूरला जाताना वाटेत पाच गड आहेत ते पाहात जाणार आहे तर तू येऊ शकतोस.असे म्हणताच तो उत्साहाने आदल्या रात्री आला आणि मी सकाळी सकाळी त्याला घेऊन आपल्या दुर्गवारीसाठी कूच केली.नियोजन होते श्री चंदन-वंदन ,श्री नांदगिरी ,श्री वर्धनगड,आणि श्री महिमानगड. आणि नुकतेच माझे जीवलग बनलेले श्री सुनिल निकम (रा.रहिमतपूर)  माझ्या येण्याची आणि भेटीची वाट पाहत होते.माझ्या मार्गाबाबत सर्व सूचना आणि काळजी त्यांनीच घेतली होती. साडेनऊला किकली या गावातील प्राचीन भैरवनाथ मंदिर पाहिले.अतिशय सुंदर असे कोरीवकाम आणि आवारामध्ये श्री .संकेत बाबर यांनी गावातील शोधून एकत्रित केलेल्या सुमारे बावन्नहून अधिक वीरगळी अभ्यासपूर्वक पाहिल्या. इतिहास अभ्यासकांनी आवर्जून पाहाव्यात या वीरगळी. तिथून लगेचच बेलमाची या पायथ्याच्या गावी पोहोचून महादेव मंदिरात साहित्य ठेवून आम्ही गड चढाईला सुरूवात केली .थोडे अंतर चढून जाताच माझ्या मित्राचा वर येण्यासाठीचा उत्साह मावळला आणि तो मटकन खालीच बसला.काही अंतर आणखी चालल्यावर मात्र तो म्हणाला "तुझे तू जाऊन ये बाबा...! !  मी बसतो इथेच  "  मी आणखी विनवणी केली तरीही म्हणाला..."मला सपाट जमिनीवरील काय दाखवायचे असेल तेवढे दाखव बास बाबा" खरे तर मित्राला पहिल्यांदाच गड चढाई म्हणजे काय हे समजून चुकले होते .मीही जास्त वेळ न लावता त्याला विश्रांती घे म्हटलं आणि गडावर गेलो.दहाच मिनिटांत दोन गडांच्या मध्ये असणाऱ्या भैरवखिंडीत पोहोचलो आणि श्री चंदन-वंदन च्या  अप्रतिम अशा दर्शनाने तृप्त होऊन गेलो.डावीकडे श्री चंदनगडाचा कडा मनाला ओढ लावत होता तर उजवीकडे श्री वंदनची उंची काळजात घर करत होती.पहिल्यांदा चंदनगडाला पाहायचे ठरवून मी कड्यालगतच्या पायवाटेने अक्षरशः धावत सुटलो...पूर्ण गडाला वळसा घालून गडाच्या पुर्वेला जायचे होते.थोड्या वेळात गडाच्या फरसबंदी मार्गाला पोहोचलो.गडाच्या थोड्या पायऱ्या चढताच मुख्य वाटेला दुभंगणारी रणमंडळ रचना चंदनगडावर आढळते.आपण ती अभ्यासली पाहिजे.पुढे जाताच गडाच्या दरवाजाचे अवशेष पाहता येतात.महादेव मंदिर ,एकावर एक ठेवलेले महाकाय दगड ,एक विहीर,ऐतिहासिक वाड्याचा चौथरा आणि झुडूपांनी ताब्यात घेतलेली एक ऐतिहासिक वास्तू पाहून गडउतार झालो.आता लक्ष्य होते श्री वंदनचे.
            भैरवखिंडीतून थोड्या वेळातच श्रीवंदनच्या  महादरवाजात पोहोचलो आणि झरझर तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहू लागला.पहिला दरवाजा पार करून दुसऱ्या दरवाजात पोहोचताच ते बांधकाम त्या ओवऱ्या पाहून अंगावरती रोमांच उभे राहू लागले अभिमानाने मान ताठ झाली.नकळत हात जोडले गेले. याच त्या किल्ले श्रीवंदनच्या भिंती आहेत ज्यांनी पाहिले माझ्या राजाला .10 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडावर अफजलखान नावाचा बलाढ्य शत्रू फाडून त्याच्या सैन्याची दाणादाण उडवली आणि विजयाचे ढोल वाजवत न बसता महाराज नेतोजीला आदेश देता झाले "चंदन-वंदन धरोनी पन्हाळा पावेतो विश्रांती नाही " आणि मग आक्रमणाच्या गगनभेदी तुताऱ्या वाजवल्या गेल्या ,शिंगे ,कर्णे ,नगारे यांच्या आवाजांनी शत्रूच्या कानठळ्या बसू लागल्या ,जावळीच्या अरण्यात आदिलशाही फौजांच्या रक्तात न्हालेल्या समशेरी तशाच शत्रूची लांडगेतोड करत श्रीवंदनच्या दिशेने धावत सुटल्या.मावळे....मावळे नव्हते ते अवघ्या मुलुखाचा घास घेत सुटलेली कालभैरवांची सेना होती ती.महाराजांच्या आदेशाने पेटून उठलेली ही सेना काय आरोळ्या देत सुटली असेल..हर हर महादेव ,हाणा,मारा,तोडा,झोडा,फोडा..त्या आरोळ्या माझ्या कानात घुमू लागल्या होत्या आणि मी रोमांचित होत होतो.... आणि ही अशी सेना घेऊन राजे 11 नोव्हेंबर 1659 ला श्रीवंदनच्या दरवाजातून गडावर पोहोचते झाले. याच भिंतींनी पाहिली अवघ्या 29 वर्षाच्या शिवरायांची धमक,त्यांच्या छातीतील उर्मी आणि अवघा सह्याद्री काबीज करण्याची इच्छा बाळगणारी नजर.तीच नजर इथल्या भिंतीवर भिरभिरत फिरली होती .हे सर्व डोळ्यांपुढे उभे राहताच ....रक्ताचा कण न् कण पेटून उठू लागला.पाठीचा कणा नकळत ताठ होऊ लागला . महाराष्ट्राच्या नव्हे नव्हे देशाच्या इतिसाला कलाटणी देणारी ती घटना होती आणि त्या अफजलवधानंतर महाराज असे काही आदिलशाही मुलुखात घुसले की त्यांच्या या रूद्रावताराने आणि मांवळ्यांच्या प्रलयंकारी तांडवाने शत्रूला पळताभुई थोडी झाली. आणि महाराजांनी अवघ्या अठरा दिवसात पन्हाळ्याचा घास घेतला. पन्हाळ्याच्या दर्शनाची माझ्या राजाला ओढ किती असावी हो...? ?  महाराजांनी अवघा पन्हाळा मशालींच्या उजेडात भर रात्री पाहिला.
          29 वर्षाच्या महाराजांच्या या महापराक्रमाला स्वतःच्या काळजात जपून ठेवणाऱ्या त्या श्रीवंदनच्या ओवऱ्यांना डोळ्यांत साठवून किल्ल्याच्या पुढील वाटचालीस सुरूवात केली.श्रीवंदनच्या मुख्य मार्गावर झाडे,झुडपे खूप वाढल्यामुळे आपली वाटचाल तटावरून होते.खरेतर शिवरायांच्या अधीर पावलांनी पावन झालेल्या या मार्गाचा श्वास आपण मावळ्यांनी करायलाच हवा.आणि आम्ही तो करूच. पुढे चुना मळणीचा घाणा असून त्याच्या पुढे आणखी एक फारसी शिलालेख असणारा छोटा दरवाजा असून त्यानंतर आपण गडावर पोहोचतो.गडावर इतिहास कालीन इमारतींचे खूप सारे अवशेष असूनही ते झाडीमध्ये गडप होण्याच्या मार्गावर आहेत.आणखी एक चहूबाजूंनी बंदिस्त अशी चारकप्पी इमारत होती ते पाहून पुढील महादेव मंदिर पाहिले.गडावर सर्वोच्च ठिकाणी भगवा डौलाने फडकत होता दोन पाण्याचे तलाव होते.काही तटबंदीचे अवशेष शिल्लक आहेत.दक्षिण दिशेला चोर दरवाजा आहे.आणि आरमारप्रमुख तुळाजी आंग्रे यांची समाधी आहे. हे सर्व डोळ्यांत साठवून गदगदलेल्या भावनेने मी श्रीवंदनच्या मातीला नमस्कार केला. माझ्या महाराजांच्या स्मृतीला असेच जपून ठेव असे मागणे मागितले आणि निरोप घेतला.
          पायथ्याशी मित्र एकटाच असल्याने लगोलग धावत सुटलो आणि अगदी वीस मिनिटांत पायथ्याशी पोहोचलो. सर्व साहित्याची जमवाजमव करून निघालो अनोखे दुर्गधन जपणाऱ्या किल्ले श्री नांदगिरीच्या दिशेने..

(क्रमशः)









































नक्की महत्त्वाचे काय ?

  28 मे 2023 रोजी महिला कुस्तीगीर विनेश फोगट आणि साक्षी मलिक या  लैंगिक अत्याचाराचे आरोप करीत निदर्शन करीत होत्या त्यांना दिल्ली पोलीस रस्त्...